Airtel, Jio, Vodafone Idea वापरकर्त्यांना पुन्हा एकदा झटका मिळणार आहे. दूरसंचार कंपन्या या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची शक्यता आहे. याआधी गेल्या वर्षीही टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, रिलायन्स Jio आणि Airtel ने देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये 5G लाँच केल्यानंतरही अद्याप मोबाइल दरात वाढ केलेली नाही.
पुढे आलेल्या एका अहवालानुसार, दूरसंचार कंपन्या त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासापासून 5G स्पेक्ट्रमपर्यंत खर्च वसूल करण्यासाठी ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढवू शकतात, ज्याचा कंपनीच्या मोबाइल टॅरिफवर परिणाम होऊ शकतो.
जागतिक एजन्सी CIRSIL रेटिंग्सने केलेल्या अभ्यासानुसार, भारतीय दूरसंचार कंपन्या या वर्षाच्या अखेरीस ARPU 8 ते 10% वाढवू शकतात. रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरीस टेलिकॉम कंपन्यांचा ARPU 190 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. टेरिफ प्लॅनचे दर वाढवून टेलिकॉम कंपन्या त्यांचा नफा 15 ते 17% वाढवू शकतात. यापूर्वी देखील दूरसंचार कंपन्या Airtel आणि Vi ने घोषणा केली आहे की, ते त्यांचे ARPU 200 रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहेत.
एअरटेल आणि जिओने 5G सेवा सुरू केल्यानंतरही त्यांच्या मोबाइल दरात वाढ केलेली नाही. या कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देत आहेत. ज्या वापरकर्त्यांकडे 5G मोबाईल फोन आहेत, ते त्यांच्या सक्रिय 4G डेटा प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. CIRSIL च्या या अहवालानुसार भारतात डेटाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना अधिक डेटा देण्यासाठी नेटवर्क अपग्रेड करत आहेत, ज्यामुळे त्यांना नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरवर सुमारे 90,000 कोटी रुपये गुंतवावे लागतील.